Skip to main content

आत्मविश्वास हा बुद्धिमत्ता विकसनाचा राजमार्ग

*#आत्मविश्वास हा बुद्धिमत्ता विकसनाचा राजमार्ग*

जून महिन्याचे सुरुवातीचे शाळेचे दिवस होते. इयत्ता पहिलीत नव्याने मुले दाखल होत होते. शाळेचे वातावरण त्यांच्यासाठी अनोळखी होते. काही मुले सभाधीटपणे बोलत तर काही मुले लाजरीबुजरी आणि घाबरलेली असायची. तीन दिवस साईची आई त्याला घेऊन सुरूवातीला बसली तरीही साई शाळेत बसल्यावर रडत असायचा. काही दिवसानं माझ्यावर त्याचा विश्वास बसल्यावर रडायचा थांबला. साईबद्दल नंतर स्वतंत्र निश्चितपणे लिहिणार आहे. यश हा एकांगी राहणारा आणि अतिशय घाबरट होता. मी वर्गाच्या बाहेर गेलो की बँंचखाली लपून बसायचा. मी विचारायचो,  "यश कुठे गेला?" मुले सांगायची, "बँंचखाली लपलाय" .
मी जवळ जाऊन त्याला बोलावण्याचा प्रयत्न केला तर रडायचा म्हणून मी त्याला जास्त बळजबरी कधीही केली नाही. तो तसाच बँचखाली लपून बसायचा.  चाॅकलेट आणल्यात ,मोबाईलवर कार्टुनस् लावल्यात म्हटल्यावर हळूच वर बसायचा तरी माझ्या जवळ यायचा नाही. एके दिवशी दोनच मुले पहिलीची आली होती. दोघंजण एका रॅम्पवर घसरगुंडी करत होते.मी दोघांच्या जवळ गेलो .मोबाईलवर कार्टुनस् लावल्या. शाळेचे सुरुवातीचे चार पाच दिवस उलटले असतील. यश माझ्या जवळ आला आणि म्हणाला ,":तुमच्या मोबाईलात गेम आहे का?"
 "कोणती रं गेम?" मी उत्तरलो.
"त्या गेमी असत्यात ना मोबाईलवर खेळायला "
"हो आहेत की"
अशा ब-याच गप्पा झाल्या .माझा मोबाईलवर  यशने ताबा मिळवला होता.बराच वेळ माझा मोबाईल घेऊन कार्टुन पाहत होता. हळूहळू यो जवळ येत होता. माझ्याच नाही आमच्या इतर मुलांसोबतही तसाच वागत असायचा. 
माझ्या मनात भिती होती की हा असाच घाबरट राहिला तर त्याचा आत्मविश्वास वाढवायचा कसा?  आणि आत्मविश्वास वाढवला नाही तर क्षमता कशा वाढवायच्या पण काही दिवसांत मला त्याच्यातील इतरांबद्दलची भिती दूर करता आली. इतका घाबरट का आहे म्हणून त्याच्या घरी एकदा गेलो होतो. त्यावेळी समजले की त्याचे वडील त्याला अधूनमधून मारत असतात. त्या भितीनेच तो घाबरट झाला असावा तसेच इतर मुलांसोबत त्याचे अनुभवही काहीसे वेगळे असू शकतात.
एक मात्र खरय की मुलांमध्ये इतरांबद्दलचा विश्वास आणि स्वतःबद्दलचा आत्मविश्वास नसला की ती मुले घाबरतात. ज्या मुलांकडे आत्मविश्वास असतो त्यांच्या बुद्धीला लवकर चालना मिळते याउलट जी मुले घाबरट असतात ती मुले मागेच राहणे पसंत करतात.यशच्या सुरुवातीला घरगुती आणि परिचयाचे काही प्रश्न विचारले तरी तो उत्तरे द्यायचा नाही. त्याच्यात आत्मविश्वास कमी होता त्यामुळे बुद्दीचा वापर करायलाही त्याला भिती वाटत असावी. मी आणि माझ्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या चांगल्या वागणुकीमुळे त्याच्यात बदल झालाय .
आज मला हक्काने प्रश्न विचारतोय, मुलांसोबत आवडीने खेळतोय.
वाचन करताना आवडीने सहभाग घेतो.माझ्याजवळ स्वतः च्या अपेक्षा व्यक्त करतोय. कारण त्याचा आत्मविश्वास वाढलाय त्यामुळे त्याची बुद्धिमत्ता विकसनासाठी प्रयत्न करणे सोपे जात आहे. 
     वेळीच लक्ष दिले नाही तर यशसारखी मुले बुजरी निघतात  आणि या बुजरेपणामुळे बुद्दीचा वापर केला जात नाही. आपण म्हणत असतो की जी वस्तू वापरली नाही तिचा विकास कमी होत असतो. यासाठी मुलांचा आत्मविश्वास कसा वाढेल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. घरातील वागणुकीचा मुलांच्या मनावर काही परिणाम होत असेल तर घरी जाऊन पालकांना कल्पना द्यायला हवी.मुलगा अमुक प्रकारे का वागतोय याचे विश्लेषण करुन पालकांना समजावून सांगता आले पाहिजे. विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वासाची कमी किंवा वाढ ही त्याला दिलेल्या वागणूकीतून ,विचारांतून घडत असते. त्यामुळे पालक आणि शिक्षक यांच्यातील समन्वयाने विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढविण्यासाठी खुप मदत होते.
आज यश मला हक्काने बोलतोय, विद्यार्थ्यांमध्ये मिसळतोय , आत्माविश्वासाने वाचतोय. 
- *ज्ञानदेव नवसरे ,नाशिक*

Comments

Popular posts from this blog

रंगू आत्मविश्वासाच्या रंगी

*रंगू आत्मविश्वाच्या रंगी*                  - ज्ञानदेव नवसरे                        आत्मविश्वास ही विजयाची चावी आहे . आत्मविश्वास असेल तर विजय पायाशी लोळण घेतो हे विद्यार्थी दशेपासून अनुभवत आलो आहोत. एखादी गोष्ट करताना, बोलताना  आत्मविश्वास खुप महत्त्वाचा असतो. आपल्यात एखाद्या गोष्टीतील आत्मविश्वास विकसित होताना  आजूबाजूच्या वातावरणाचा मोठा पगडा असतोय.                    महाराष्ट्रात येवल्याचा पतंगोत्सव प्रसिद्ध आहे.इथे पतंग उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. गेल्या आठ -पंधरा दिवसांपासून बच्चे कंपनी पतंगोत्सवाची लगबग सुरु होती आणि आज मोठ्या आनंदाने साजरा करत आहेत. आमच्या शेजारला राहणाऱ्या दिगांबर यादव सरांचा मुलगा दादूची अन शंभूची खुप छान गट्टी आहे. तो शंभुपेक्षा मोठा आहे वय अन अनुभवाने सुद्धा. मुलं घरातील अन बाहेरील अनुकरणातून ब-याच गोष्टी शिकत असतात तसे शंभू देखील दादूकडून अनेक गोष्टी शिकत असतो. पतंग ,रीळ, मांजा...

माझा पाडा ,माझे विद्यार्थी

 *माझा पाडा, माझे लोक, माझे विद्यार्थी*     - ज्ञानदेव नवसरे        पेठ तालुक्यातील आदिवासी भागातील सेवा हा आयुष्यभर न विसरता येणारा ठेवा आहे .पेठच्या पश्चिमेस १० किमी अंतरावर गुजरात सरहद्दीवर असणारे डोंगराच्या पायथ्याशी निसर्गाच्या सानिध्यात वसलेले टुमदार असा कळमपाडा माझ्या सुरूवातीच्या सात वर्षांच्या नोकरीचा न विसरता येणारा महत्त्वाचा टप्पा होता.            कोराना कालावधीमुळे लांबणीवर पडलेली आमची कळमपाडा शाळेचे भेट आज धामणगाव शाळेच्या टीमसोबत  झाली.           कळमपाडा हे निसर्गाने जितके नटलेलं आहे त्यापेक्षा जास्त या पाड्यामध्ये राहणाऱ्या माझ्यासारख्या पर-जिल्ह्यातून आलेल्या लेकरावरं स्वतःच्या लेकराइतकं, भावाइतकं प्रेम करणाऱ्या माझ्या ह्रदयस्पर्शी लोकांचं हे गाव आहे. माझ्याबद्दल कळमपाड्यातील लोकं काय बोलतात हे कळमपाड्यातील लोकं , माझे विद्यार्थी बोलतील ,याबद्दल मी काय बोलणार ?               काम करणा-या शिक्षकांच्या कामाचा सन्मान कसा करावा हे आमच्या कळमप...

मुलांच्या कल्पनेच्या दुनियेत

* मुलांच्या कल्पनेच्या दुनियेत ....* 📝 *ज्ञानदेव नवसरे, नाशिक* फोटो सौजन्य : Google              आज पहिलीच्या मुलांना मुक्त चित्र काढण्यासाठी कोरे कागद दिले होते. मी फळ्यावर फुले,बादली, ग्लास, फुलपाखरू यांचे सोप्या पद्धतीने काढलेली चित्रे फळ्यावर रेखाटली होती.      सचिन ने काढलेले चित्र मला दाखवले. मी म्हणालो,"हे काय आहे ?" सचिन, "हे भूताचे , हे माझे आणि हे माझ्या घराचे चित्र आहे". मी म्हटले, छान काढलेय. मुलांनी सचिनचे चित्र पाहायला लगबग केली. सचिनच्या जवळ मुलांचा गलका जमा झाला. त्यांच्यात भुतांच्या गोष्टी वर गप्पा सुरू झाल्या. भूत अमुक असतं ,तमुक असतं आणि ब-याच गोष्टी चालू होत्या.माझ्या इयत्ता चौथीचा इंग्रजी विषय असल्याने मी पेपर तपासत असताना मुलांमधील सुरु असणा-या गप्पांकडे लक्ष जात होतेच.थोडा वेळ थांबून ऎकून घेतले. गावात म्हसोबाचे मंदीर आहे त्या देवस्थानाला जागृत देवस्थान म्हटले जातेय. भूत म्हणले की देव आलाच त्यामुळे म्हसोबावर बोलत होते. म्हसोबावर कडे हातात घातले की भूत काय बी करत नाय. माझी आई म्हसोबाला  दिवा लावते ...