Skip to main content

आत्मविश्वास हा बुद्धिमत्ता विकसनाचा राजमार्ग

*#आत्मविश्वास हा बुद्धिमत्ता विकसनाचा राजमार्ग*

जून महिन्याचे सुरुवातीचे शाळेचे दिवस होते. इयत्ता पहिलीत नव्याने मुले दाखल होत होते. शाळेचे वातावरण त्यांच्यासाठी अनोळखी होते. काही मुले सभाधीटपणे बोलत तर काही मुले लाजरीबुजरी आणि घाबरलेली असायची. तीन दिवस साईची आई त्याला घेऊन सुरूवातीला बसली तरीही साई शाळेत बसल्यावर रडत असायचा. काही दिवसानं माझ्यावर त्याचा विश्वास बसल्यावर रडायचा थांबला. साईबद्दल नंतर स्वतंत्र निश्चितपणे लिहिणार आहे. यश हा एकांगी राहणारा आणि अतिशय घाबरट होता. मी वर्गाच्या बाहेर गेलो की बँंचखाली लपून बसायचा. मी विचारायचो,  "यश कुठे गेला?" मुले सांगायची, "बँंचखाली लपलाय" .
मी जवळ जाऊन त्याला बोलावण्याचा प्रयत्न केला तर रडायचा म्हणून मी त्याला जास्त बळजबरी कधीही केली नाही. तो तसाच बँचखाली लपून बसायचा.  चाॅकलेट आणल्यात ,मोबाईलवर कार्टुनस् लावल्यात म्हटल्यावर हळूच वर बसायचा तरी माझ्या जवळ यायचा नाही. एके दिवशी दोनच मुले पहिलीची आली होती. दोघंजण एका रॅम्पवर घसरगुंडी करत होते.मी दोघांच्या जवळ गेलो .मोबाईलवर कार्टुनस् लावल्या. शाळेचे सुरुवातीचे चार पाच दिवस उलटले असतील. यश माझ्या जवळ आला आणि म्हणाला ,":तुमच्या मोबाईलात गेम आहे का?"
 "कोणती रं गेम?" मी उत्तरलो.
"त्या गेमी असत्यात ना मोबाईलवर खेळायला "
"हो आहेत की"
अशा ब-याच गप्पा झाल्या .माझा मोबाईलवर  यशने ताबा मिळवला होता.बराच वेळ माझा मोबाईल घेऊन कार्टुन पाहत होता. हळूहळू यो जवळ येत होता. माझ्याच नाही आमच्या इतर मुलांसोबतही तसाच वागत असायचा. 
माझ्या मनात भिती होती की हा असाच घाबरट राहिला तर त्याचा आत्मविश्वास वाढवायचा कसा?  आणि आत्मविश्वास वाढवला नाही तर क्षमता कशा वाढवायच्या पण काही दिवसांत मला त्याच्यातील इतरांबद्दलची भिती दूर करता आली. इतका घाबरट का आहे म्हणून त्याच्या घरी एकदा गेलो होतो. त्यावेळी समजले की त्याचे वडील त्याला अधूनमधून मारत असतात. त्या भितीनेच तो घाबरट झाला असावा तसेच इतर मुलांसोबत त्याचे अनुभवही काहीसे वेगळे असू शकतात.
एक मात्र खरय की मुलांमध्ये इतरांबद्दलचा विश्वास आणि स्वतःबद्दलचा आत्मविश्वास नसला की ती मुले घाबरतात. ज्या मुलांकडे आत्मविश्वास असतो त्यांच्या बुद्धीला लवकर चालना मिळते याउलट जी मुले घाबरट असतात ती मुले मागेच राहणे पसंत करतात.यशच्या सुरुवातीला घरगुती आणि परिचयाचे काही प्रश्न विचारले तरी तो उत्तरे द्यायचा नाही. त्याच्यात आत्मविश्वास कमी होता त्यामुळे बुद्दीचा वापर करायलाही त्याला भिती वाटत असावी. मी आणि माझ्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या चांगल्या वागणुकीमुळे त्याच्यात बदल झालाय .
आज मला हक्काने प्रश्न विचारतोय, मुलांसोबत आवडीने खेळतोय.
वाचन करताना आवडीने सहभाग घेतो.माझ्याजवळ स्वतः च्या अपेक्षा व्यक्त करतोय. कारण त्याचा आत्मविश्वास वाढलाय त्यामुळे त्याची बुद्धिमत्ता विकसनासाठी प्रयत्न करणे सोपे जात आहे. 
     वेळीच लक्ष दिले नाही तर यशसारखी मुले बुजरी निघतात  आणि या बुजरेपणामुळे बुद्दीचा वापर केला जात नाही. आपण म्हणत असतो की जी वस्तू वापरली नाही तिचा विकास कमी होत असतो. यासाठी मुलांचा आत्मविश्वास कसा वाढेल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. घरातील वागणुकीचा मुलांच्या मनावर काही परिणाम होत असेल तर घरी जाऊन पालकांना कल्पना द्यायला हवी.मुलगा अमुक प्रकारे का वागतोय याचे विश्लेषण करुन पालकांना समजावून सांगता आले पाहिजे. विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वासाची कमी किंवा वाढ ही त्याला दिलेल्या वागणूकीतून ,विचारांतून घडत असते. त्यामुळे पालक आणि शिक्षक यांच्यातील समन्वयाने विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढविण्यासाठी खुप मदत होते.
आज यश मला हक्काने बोलतोय, विद्यार्थ्यांमध्ये मिसळतोय , आत्माविश्वासाने वाचतोय. 
- *ज्ञानदेव नवसरे ,नाशिक*

Comments

Popular posts from this blog

लेकरांच्या कमी वयात पालकांच्या अपेक्षा ..

*लेकरांच्या कमी वयात पालकांच्या अपेक्षा..* www.Shikshanvichar.blogspot.in              अलीकडे  पाल्यांच्या विकासासाठी पालक मेहनत घेताना दिसत आहेत . पालकत्व म्हणून त्यांचे खुप कौतुकच करावे लागेल पण यामध्ये मुलांची गुणवत्ता, आवड निवड, त्याचे वय, क्षमता लक्षात घेऊन प्रयत्न करायला हवेत असे मला वाटते. जिथे मुलगा दोन वर्ष पूर्ण करतोय , नीट बोलायला लागत नाही तिथे आई बाप लेकराला नर्सरी वगैरे वर्गात कोंबतात. मुलांना अभ्यास करायचा ससेमिरा पाठीमागे लागण्याचे वातावरण घरोघरी तयार होताना दिसत आहे आणि ते भयानक आहे . नर्सरी, प्ले ग्रुप वगैरे या वर्गात टाकायला हरकत नाही पण तिथे त्याच गोष्टी व्हाव्यात ज्या घडायला हव्यात.  गाणी, खेळ या गोष्टींसाठी त्यांचा फायदाही होतोच. पण यासोबतच कमी वयाच्या याच लेकरांकडून पालकांच्या अपेक्षा वाढायला सुरु होतात . मुलाने लिहिले पाहिजे, वाचले पाहिजे असे त्यांना वाटते. त्यासाठी अभ्यास घ्यायला सुरुवात होते. मुलांनी अभ्यास करावा असे पालकांना वाटू लागते. मुलांचा अभ्यास म्हणजे काय हो?  महागडी पुस्तके, वह्या , वर्कबुक ,सीड...

लेकरांनो, तुमच्यासाठीच...

*लेकरांनो, तुमच्यासाठीच......*           🖋 *ज्ञानदेव नवसरे ,धामणगाव* @⁨राजेंद्र चव्हाण HM धामणगाव⁩  अर्थात माझे मुख्याध्यापक सर यांचे आज नोकरीची चार -साडेचार वर्ष बाकी आहेत पण कामाची ऊर्जा ,तळमळ आजही चार वर्ष नोकरी झालेल्या शिक्षकासारखी. कामाची धडपड तरुण शिक्षकांनाही लाजवेल अशीच.          काल शनिवारी शाळा सुटल्यानंतर आम्ही दोघं शाळेसाठी  लेझीम, टिप-या,ट्राॅफ्या, बँकेचे काम , माईक स्टॅण्ड, ड्रम स्टॅण्ड ,शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी येवल्यातून नाशिक ला बाईकवर गेलो होतो. सर्व साहित्य एकाठिकाणी मिळणार नव्हतं त्यामुळे  नाशिकमध्ये गेल्यानंतर एका जागेवरून दुस-या जागेवर जाण्यासाठी आम्हाला बाईकची गरज पडणार होती म्हणून बाईकवरच जाणे गरजेचे होते. गाडीमुळे  आमचा वेळ वाचणार होता अन कामे पटकन होणार होती पण साहित्य बरंच असल्याने अडचणीत वाढही होणार होती. त्यातच शनिवारी शाळा सुटल्यानंतर जेवण करुन घरची कामं आवरुन निघायला येवल्यातच १२ वाजून गेले.  निघता करता १२:३० झाले . येवल्यात सुरु झालेली गाडी शेवटी २:३०  वाजता...

शिक्षण म्हणजे नुसती पोपटपंची नव्हे.

#पालकत्व      ✍🏻 ज्ञानदेव नवसरे आज मेन्स पार्लरच्या दुकानात बसलेलो होतो .त्याठिकाणी इंग्रजी माध्यमात शिक्षण घेणारे दोन पालक शेजारीच बसले होते (विशेष म्हणजे ते मराठी शाळेचे शिक्षकच अाहेत) . आज सुट्टी असल्याने त्यांच्या लेकरांना पण घेऊन आले होते. त्यांच्या चर्चा चालु होत्या. आमच्या सोम्याची शाळा अमुक करुन घेतेय ,दुसरा सांगता होता आमच्या गोम्याची शाळा तमूक करून घेतेय. सहज मुलांना प्रश्नही केले जात होते.  पाठांतरावर आ्दारित अअसणाऱ्या प्रश्नांची मुले सहज उत्तरे देत होती. एकमेकांकडून एकमेकांच्या लेकरांना शाबासकी ददेण्याचे काम सुरु होते.  मी शांतपणे सर्व ऎकून घेत होतो. माझ्या मनात विचार आला की मुलांची अशी पोपटपंची म्हणजे शिक्षण असे पालकांना वाटतेय का?  खरोखरच याला शिक्षण म्हणावे का ? खरंतर शिक्षण म्हणजे विकास, शिक्षण मम्गणजे सुसंस्कार , शिक्षण म्हणजे अभिव्यक्ती इतक्या व्यापक अर्थाने असणारा हा शब्द आज केवळ परिक्षा अन परीक्षेचे गुणदान यापुरता मर्यादित राहतोय का?  आणि त्याच दृष्टीने प्रयत्न म्हणजे केवळ परिक्षा तयारी च्या शिक्षण हे मुलांचा विकास त्यांच्या कल...