Skip to main content

सहनशक्तीचा डाव

😡😥🤩 *सहनशक्तीचा डाव* 🤩😥😡
                     🖋 *ज्ञानदेव नवसरे*   
        www.Shikshanvichar.blogspot.in

          मुलांना खेळायला आवडते .खेळताना जिंकायला आवडते. मुले खेळात जिंकण्यासाठी जीवाचा आटापिटा करतात. जीव ओतून खेळतात पण इतके करुनही हार मिळाली की कासावीस होतात.एकमेकांवर राग करायला सुरुवात करतात.
            अध्यक्ष चषकाच्या स्पर्धांच्या तयारीसाठी शाळेत इयत्ता सहावी- सातवी कबड्डीचा सराव आमचे पदवीधर शिक्षक रामेश्वर जाधव सर घेत असायचे. एका शनिवारी त्यांना कामामुळे शाळेवर उपस्थित राहता आले नाही.
          अध्यक्ष चषक स्पर्धा जवळ येतेय, मुलांचा चांगला सराव व्हावा  यासाठी खेळाडूंना मैदानावर घेऊन जावे लागले.मुलांनी त्यांच्या पद्धतीने दोन गटात विभागणी करुन घेतली. एक गट दुस-यापेक्षा जास्तच सरस झाला होता.सातवीचा सचिन जेजुरकर त्यांचे नेतृत्व करत होता. पाच पाच मिनिटाचे दोन सामने झाले पण सचिनच्या गटानेच विजश्री खेचून आणली. माझ्या लक्षात आले की दोन्हीकडं सारख्याच ताकदीचे तुल्यबल खेळाडू असायला हवेत म्हणून थोडा बदल करत सचिनच्या गटातील दोघांची अदलाबदली केली. आता सामन्यात आणखी रंगत येऊ लागली. दोन्हीबाजूंनी सामना जिंकायची रस्सीखेच सुरु झाली. प्रत्येकजण स्वतः चा संघ जिंकण्यासाठी प्रयत्न करु लागला. आम्हीच जिंकू असा विश्वास सचिनला वाटायचा कारण तो स्वतः पण चांगला खेळ करतो. यावेळी मात्र सचिनच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. पुन्हा मीच जिंकेल या विश्वासाने नव्याने दुसरा सामना खेळायला सुरुवात झाली पण पुन्हा पराभव झाला.
दोन वेळा पराभव स्वीकारलेल्या सचिनचे लक्ष सोबतच्या खेळांडूवर गेले. त्याने पराभव झाल्यानंतर  इतरांवर चिडायला सुरुवात केली. सहकारी खेळाडूंच्या खेळाचा त्याला राग येऊ लागला. नीट खेळा म्हणून ओरडायला लागला.सहकारी खेळाडूंना भलतंसलतं बोलायला सुरुवात केली. दोन्ही संघ प्रत्येकी दोन डाव जिंकला होता.
           नवीन डाव सुरु करण्याअगोदर सर्वांना जवळ घेतले अन समाजवून सांगितले. नाण्याला जशा दोन बाजू असतात तशा खेळातही हार अन जीत असतेच. आज दुसरा जिंकला तर उद्या तुम्ही जिंकत असता . खेळावरील लक्ष, सराव, जिंकण्याची जिद्द, समूहकृतीतून तुम्ही जिंकता आणि आनंद साजरा करतात. खेळातील आनंद जसा आवडतो तसा पराभव झाल्यावर समूहभावनेतून त्या सहन करायला सुद्धा आवडायला हवे,  शिकायला हवे. यश मिळाले तर माझ्यामुळे अन पराभव झाला तर सहका-यांकडे पाहण्याची सवय आपल्याला निराशाकडे घेऊन जाते. आपल्या संघाची हार झाली तर आणखी जिद्द,चिकाटी अन एकसंघ खेळून पुन्हा विजश्री आणता येईल कारण हार के आगे जीत है | यातूनच तुमची सहनशक्ती विकसित होणार आहे .
            सहनशक्ती विकसित झाली की भविष्यातील अडचणींना सामोरे जाताना अडचण येत नाही. आपण अडचण सोडविण्यात यशस्वी नाही झालो तर त्यासाठी सहनशक्ती वाढवू शकतो त्यामुळे भविष्यात नैराश्य येत नाही.
            ज्यावेळी मुले हसत हसत हार पचवायला लागतात त्यावेळी त्यांच्यातील खिलाडूवृत्ती अाणखी विकसित होत असते ,ही एक चांगली सवय आहे. स्वतः ची दुबळी सहनशक्ती संपल्यामुळे जगभरातील अनेक लोकं जीवनातील समस्यांना ,दुखांना , अडचणींचा सामोरे जाताना स्वतः ची जीवन यात्रा संपवत आहेत . खरंतर अशा खेळाच्या प्रसंगातून मुलांना भविष्यातील अनेक बाबींबद्दल सजग करता येत असते. विद्यार्थ्यांना अनुभव देताना स्वतःलाही समृद्ध बनवता येते.

धन्यवाद ...

Comments

Popular posts from this blog

लेकरांनो, तुमच्यासाठीच...

*लेकरांनो, तुमच्यासाठीच......*           🖋 *ज्ञानदेव नवसरे ,धामणगाव* @⁨राजेंद्र चव्हाण HM धामणगाव⁩  अर्थात माझे मुख्याध्यापक सर यांचे आज नोकरीची चार -साडेचार वर्ष बाकी आहेत पण कामाची ऊर्जा ,तळमळ आजही चार वर्ष नोकरी झालेल्या शिक्षकासारखी. कामाची धडपड तरुण शिक्षकांनाही लाजवेल अशीच.          काल शनिवारी शाळा सुटल्यानंतर आम्ही दोघं शाळेसाठी  लेझीम, टिप-या,ट्राॅफ्या, बँकेचे काम , माईक स्टॅण्ड, ड्रम स्टॅण्ड ,शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी येवल्यातून नाशिक ला बाईकवर गेलो होतो. सर्व साहित्य एकाठिकाणी मिळणार नव्हतं त्यामुळे  नाशिकमध्ये गेल्यानंतर एका जागेवरून दुस-या जागेवर जाण्यासाठी आम्हाला बाईकची गरज पडणार होती म्हणून बाईकवरच जाणे गरजेचे होते. गाडीमुळे  आमचा वेळ वाचणार होता अन कामे पटकन होणार होती पण साहित्य बरंच असल्याने अडचणीत वाढही होणार होती. त्यातच शनिवारी शाळा सुटल्यानंतर जेवण करुन घरची कामं आवरुन निघायला येवल्यातच १२ वाजून गेले.  निघता करता १२:३० झाले . येवल्यात सुरु झालेली गाडी शेवटी २:३०  वाजता...

जबाबदारी विकासाची

#जबाबदारी_विकासाची व्यक्तीच्या वर्तनात अपेक्षित वर्तनबदल घडवून आणणारी ,सर्वांगीण विकास साधणारी स्वयंस्फूर्त, अखंड चालणारी सामाजिक प्रक्रिया म्हणजे शिक्षण ...शिक्षण प्रक्रिया कुटुंब, शाळा आणि समाज या संस्थांच्या माध्यमातून चालू असते.  मुलांच्या अध्ययनास मदत करणाऱ्या या संस्थांवर असणारी जबाबदारी सर्वांनी समजून घेणे गरजेचे असते. विद्यार्थी विकासाची संपूर्ण जबाबदारी शाळाचीच आहे असे म्हणणे म्हणजे स्वतः च्या जबाबदारीतून काढता पाय घेणे . कुटुंबाने काढता पाय घेतला तर मुलांच्या अध्ययनाच्या आणि विकासाच्या गतीवर परिणाम घडून येतो. मूल हे समाजाचा एक अविभाज्य घटक आहे .समाजातील सकारात्मक व नकारात्मक वातावरणात वाढत असते. शाळा ,कुटुंब यांनी निरीक्षणातून मुलांच्या विकासाच्यादृष्टीने प्रयत्नास मदत भेटत असते. शाळेतील अनेक गोष्टी मुलं कुटुंब आणि समाजाकडून शिकत असते याउलट समाजातील अनेक गोष्टी शाळा अन कुटुंबासोबत शिकत असते. कुटुंब, शाळा आणि समाज या संस्थांच्या पातळीवर विद्यार्थी विकासाचा राजमार्ग पालक व शिक्षकांनी लक्षात घेऊन त्यादृष्टीने प्रयत्न केल्यास मुलांचा सर्वांगीण विकास करणे सोपे जाते असे मला...