#प्रेरणादूत :- आशाबाई विजय जेजूरकर
- जि.प.प्राथमिक शाळा धामणगाव
सालाबादप्रमाणे या वर्षीही जि.प.प्राथमिक शाळा धामणगाव येथे राजर्षी शाहू महाराज सामाजिक संस्था खोंदला आयोजित मी ज्ञानी होणार हा सामान्यज्ञानावर आधारित उपक्रम गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे. या उपक्रमामध्ये आमच्या शाळेतील एक शिक्षक दररोज फळ्यावर संस्थेमार्फत दिले जाणारे पाच प्रश्न लिहित असतो , शाळेच्या आवारात हा फळा मुलांना प्रश्न वहीत उतरून काढण्यासाठी ठेवला जात असतो.मुले वहीत लिहितात, दरमहिन्याला एक सराव चाचणी परिक्षा घेतली हा नित्यक्रमे वर्षभर चालणारा आमचा कार्यक्रम.
शाळेतील ही प्रकिया घडत असताना याचा परिणाम शाळेतील आजूबाजूच्या घटकांवरही कसा होतो याचे हे उदाहरण आहे. आमच्या शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी असणाऱ्या शा.पो.आ चे काम पाहणाऱ्या आशाबाई विजय जेजूरकर . सर्व विद्यार्थी , आम्ही शिक्षक त्यांना मामी म्हणतो. त्या शाळेच्या आवारात ठेवलेल्या फळ्याचे वाचन नियमित करत असतात. दररोज लिहिलेले प्रश्न जाणून घेण्याची मामींना जणू जिज्ञासाच असते . आमच्यासोबत अधूनमधून विविध प्रश्नांची चर्चा करत असतात. मामींना फळा वाचनाची चांगलीच आवड तयार झालेली आहे.
आज कवायत झाल्यानंतर नम्रता मॅडम, जाधव सर यांनी सामान्यज्ञान चाचणीसाठी विद्यार्थी रांगेत आणि अंतरावर विद्यार्थी बसवले , पेपरचे वाटप केले. विद्यार्थी परिक्षा देण्यात गढून गेले होते. मुख्याध्यापक राजेंद्र चव्हाण सर मुलांचे पर्यवेक्षण करत होते. काही मुलांचे पेपर पूर्ण लिहूनही झाले होते. त्यांनी पेपर जमा केले. बाकीच्या मुलांचे पेपर सोडवून होईपर्यंत जाधव सर, मी आणि नम्रता मॅडम पेपर चेक करत होतो.
दररोजचे प्रश्न वाचन करणाऱ्या मामींना प्रश्नपत्रिका जाणून घेण्यासाठी आमच्या जवळ आलेल्या होत्या. प्रश्नपत्रिका वाचन करत होत्या. आम्ही मामींना सहज शब्द टाकला मामी सोडवता का पेपर ? शिल्लक पेपर मामींना दिला. मामींनी दहा -पंधरा मिनिटात २५ गुणांचा पेपर सोडवून पुन्हा आमच्या जवळ हजर. "सर , तपासा माझा पेपर " पेपर जमा करून पुन्हा त्या आपल्या कामाला लागल्या. मुलांचे पेपर बाजूला करून मामींचा पेपर जाधव सरांनी तपासला , त्यांनी १२ प्रश्न अगदी अचूक सोडवले होते. मामींनी ना वहीत लिहिलेले ना परिक्षा आहे म्हणून प्रश्नांची उजळणी सराव केलेला तरीही इतके चांगले गुण मिळवणे म्हणजे आमच्यासाठी नवलच होते.
खरोखरच मामींचे कौतुक करावे तितके कमीच आहे. मामींना वाचनाची भारी आवड आहे.घरच्या बिकट आणि कठीण परिस्थितीमुळे मामींना दहावी पर्यंतच शिक्षण घेता आले.शिक्षण जरी सुटले तरी माणूस शिकायचा थांबत नाही हे त्यांनी दाखवून दिले .
शाळेत सुरू असलेले उपक्रम, कार्यक्रम, कृती परिसरातील घटकांवरही परिणाम करत असते याचे हे एक उदाहरण आहे . मुलांना शिकण्याचे वातावरण तयार झाल्यावर मुले आपोआप शिकतात याचेही एक उदाहरण.मामींमुळे आपल्या जाणून घेता येईल की शिक्षण ही आपल्या सभोवतालच्या गोष्टींबद्दल , प्रसंगाबद्दल शिकण्याची प्रक्रिया आहे. हे आपल्याला कोणतीही वस्तू किंवा परिस्थिती सहजपणे समजून घेण्यास शिक्मषणामुळेमदत होत असते . शिक्षण आयुष्याला दिशा देते , संतुलन ठेवते. अशा शिक्षणाचे महत्त्व जाणणाऱ्या आमच्या मामींचे खुप कौतुक. आमच्या शाळेतील शैक्षणिक अनुभवांचा परिसरात घडणाऱ्या बदलांचा अनुभव आमच्यासाठी समाधानाचा आहे.
धन्यवाद 🙏🏻
Comments
Post a Comment