*माझा पाडा, माझे लोक, माझे विद्यार्थी*
- ज्ञानदेव नवसरे
पेठ तालुक्यातील आदिवासी भागातील सेवा हा आयुष्यभर न विसरता येणारा ठेवा आहे .पेठच्या पश्चिमेस १० किमी अंतरावर गुजरात सरहद्दीवर असणारे डोंगराच्या पायथ्याशी निसर्गाच्या सानिध्यात वसलेले टुमदार असा कळमपाडा माझ्या सुरूवातीच्या सात वर्षांच्या नोकरीचा न विसरता येणारा महत्त्वाचा टप्पा होता.
कोराना कालावधीमुळे लांबणीवर पडलेली आमची कळमपाडा शाळेचे भेट आज धामणगाव शाळेच्या टीमसोबत झाली.
कळमपाडा हे निसर्गाने जितके नटलेलं आहे त्यापेक्षा जास्त या पाड्यामध्ये राहणाऱ्या माझ्यासारख्या पर-जिल्ह्यातून आलेल्या लेकरावरं स्वतःच्या लेकराइतकं, भावाइतकं प्रेम करणाऱ्या माझ्या ह्रदयस्पर्शी लोकांचं हे गाव आहे. माझ्याबद्दल कळमपाड्यातील लोकं काय बोलतात हे कळमपाड्यातील लोकं , माझे विद्यार्थी बोलतील ,याबद्दल मी काय बोलणार ?
काम करणा-या शिक्षकांच्या कामाचा सन्मान कसा करावा हे आमच्या कळमपाड्यातील लोकांकडून शिकावं .
ब-याच दिवसानंतर आमचा गुरुजी दिसल्यावर डोळ्यात पाणी आणून माझे पाय पकडू पाहणाऱ्या आमच्या भोये आजी , मला दररोज दुपारच्या जेवणामध्ये माझ्या मास्तरला घरातली भाजी ,नागलीची भाकरी देणाऱ्या आमच्या बोके मावशी ,शाळा सुटल्यानंतर माझ्या मास्तरला गावरान रानभाज्या न चुकता आणून देणाऱ्या गावातल्या माझ्या आया-बहिणी , पाड्यावरचे आमचे तरुण मित्रमंडळी, बदली झाल्यानंतर डबडबणा-या डोळ्यांनी निरोप देणारे गावकरी पुन्हा भेटल्यानंतर गहिवरून येते .
कळमपाड्यातील लोकांच्या शिक्षकांच्या मान सन्मान आणि आदराच्या भावनेमुळे मनाला शिक्षकीपेशामध्ये आपण योग्य वाटेवर आहोत याची जाणीव करून देतात.
कळमपाडा गावातील तात्कालीन आमचे शा.व्य.समिती चे अध्यक्ष हरिभाऊ ,शा.पो.कर्मचारी पागी ताई, आमच्या कळमपाडा शाळेचा शेजारी गोपाळ आणि गावकरी यांना भेटून खुप आनंद झाला.
कळमपाडा शाळेवर मी लावलेली झाडं आज माझ्यापेक्षा मोठी झालेत, माझे डोलाने मान हलवून स्वागत करतात. त्यांच्याकडे पाहून ती छोटी छोटी रोपे ,आम्ही मोठं झालो हे सांगतात. शाळेच्या भिंतीकडे पाहून भितीवरील आमच्या कल्पनेतून रंगलेली चित्रे टक लावून पाहतात, जणूकाही चित्रांमध्ये जीव आलाय आणि मला त्यांच्याकडे पाहण्यासाठी खुणावत आहेत.
आमचे सर आलेत हे अभिमानाने सांगणारे विद्यार्थी पाड्यातील आज सुजाण तरूण आहेत.आत्तापर्यंत १० वी, १२ वीला कळमपाड्याच्या इतिहासात सर्वात जास्त मार्कस् घेणारे हेच विद्यार्थी आहेत.आज पुढील शिक्षणासाठी काही विद्यार्थी परगावी आहेत . फक्त परीक्षेतील गुणच नाहीत तर तुमच्यामुळे शिकलेली मुले हुशारच आहेत हे गावातील लोकांचे बोल त्यांच्या गावातील वर्तनाचे दाखले देत आहेत. बदली झाली म्हणून काय झाले , मुलांच्या सोबत आजही आम्ही आहोत .आजही फोन करून मार्गदर्शन घेतात . आमच्या तब्येतीची विचारणा करतात.
आज आमच्या धामणगाव शाळेतील शिक्षक वृंद मुख्याध्यापक चव्हाण सर ,जाधव सर, दिक्षीत सर, आमचे मित्र लांडगे सर यांच्यासोबत पुन्हा एकदा पेठ दर्शन केले. सोबत लाडेकर सर, भोये सर होतेच सोबतीला.गावातील लोकांनी पाड्यावर आम्ही केलेल्या कामाचा पाढा , मुलांमध्ये झालेले बदल जेव्हा माझ्या सध्याच्या शिक्षक वृंदासमोर वाचला तेव्हा त्यांनाही नवल वाटले की शिक्षकावर ही लोकं किती प्रेम करतात. खरच मी नशिबवान होतो मला कळमपाड्यासारख्या आदिवासीबहुल भागात काम करण्याची संधी मिळाली.
कळमपाडा भेट , पाड्यावरील प्रत्येक क्षण म्हणजे ह्रदय जिंकण्याचा असतो. आमचे खोलीमालक महाले सर आणि महाले ताई म्हणजे आमच्या जीवाला जीव देणारी माणूसं .
वारक-यांना पंढरपूरला गेल्यावर जसे समाधान मिळते तसे मला कळमपाड्याला मिळते.
बदली झाली म्हणून काय झालं ही जीवाला जीव देणा-या माणसांच्या दर्शनासाठी, शिक्षकी पेशातील कामाचे समाधान देणा-या या तीर्थस्थळास आयुष्यभर वा-या चालूच राहतील.
आज आमच्या राजर्षी शाहू महाराज सामाजिक संस्था खोंदला या संस्थेच्या माध्यमातून पेठ तालुक्यातील नालशेत या पाड्यावरच्या मुलांना खेळाचे साहित्य भेट देऊन आम्हाला आत्मिक समाधान लाभले.
धन्यवाद 🙏🏻🙏🏻
Great work sirji..👍
ReplyDeleteGreat
ReplyDelete